17 December 2016

आपल्या आहारातील तूप व लोणी याचे महत्व (Importance Of Ghee)

No comments :

तूप किंवा लोणी हे पदार्थ खावेत का नाही याबाबत खूप वेगवेगळी मते आहेत. बरेचजण वजनवाढीच्या भितीने तूप/लोणी या पदार्थापासून लांब रहातात. पण खरेच तुप/लोणी खाल्ल्याने वजन वाढते का? शरीराला ते उपयोगी आहे का? का अपायकारक हे, पुढील लेख वाचून तुम्हीच ठरवा.

लोणी
दूधाच्या साईचे दही लावून ते घुसळून बनवलेल्या ताकापासून काढलेले लोणी प्रकृतीस हितकर असते. त्यात प्रामुख्याने ‘अ’, ‘ई’ आणि ‘ड’ जीवनस’त्त्वे असतात. इतर अँटि ऑक्सिडंट्स देखील लोण्यात असून ते स्निग्ध गुणात्मक आहे. त्वचा, डोळे आणि हाडांच्या आरोग्यासाठीही लोणी उपयुक्त आहे. आयुर्वेदात काही औषधे लोण्याबरोबर दिली जातात. सांधेदुखीवरही त्याचा खूप फायदा होतो.

तूप
आरोग्यवर्धक समजले जाते. लोणी कढवून त्यातील पाण्याचा अंश पूर्णत: काढून टाकल्यावर उरलेला सारभूत पदार्थ म्हणजे साजूक तूप वं असे तूप सवयंपाक घरातीलअविभाज्य घटक आहे. भारतात साजूक तुपाला आहारामध्ये ‘राजेशाही’ स्थान आहे. साजूक तुपात १०० टक्के फॅट्स आणि ९०० कॅलरीज आहेत. एक चमचा तुपात १३ ग्रॅम फॅट्स, आणि ११७ कॅलरीज असतात. सर्वसाधारणपणे रोज दोन लहान चमचे किंवा पळीभर साजूक तूप मोठयांच्या आहारात सुचवले जाते.

लोणी कढवून त्यापासून तूप तयार होते. हे तूप गाळून घेतल्यावर खाली राहिलेला भाग म्हणजे तुपाची बेरी. लोण्यापासून अशा पद्धतीने तयार केलेले साजूक तूप औषधी असते. साजूक तुपातील ओमेगा- ६ व ओमेगा- ३ फॅटी अ‍ॅसिडस्चे प्रमाण असे असते की ते योग्य प्रमाणात खाल्ले गेल्यास त्याचा दुष्परिणाम न होता उलट हृदयाचे आरोग्य सांभाळले जाते. तुपातील ‘कोलीन’ हे तत्त्व स्मरणशक्तीसाठी उपयुक्त असते. तूप हे उत्तम पाचक असल्याने जड जेवणात त्याचा वापर सयुक्तिक ठरतो. त्याने पाचकरसांचे उद्दीपन केले जाते.

साजूक तूपामध्ये रेटिनॉल व बेटाकेरोटीन हे घटक आहेत. हे पौष्टिक घटक डोळयांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जातात. २०१० मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार साजूक तूप हे रक्तातील सर्वात वाईट कोलेस्टेरॉल कमी करते. तसेच, चांगले कोलेस्टेरॉल वाढवते.

वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही. 

जाणून घ्या, तूप खाल्याने होणारे फायदे... 

* शुद्ध, साजूक तुपामुळे बुध्दी कुशाग्र होते.कांती मऊ व तजेलदार होते.

* तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.

* रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.

* शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.

* तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. दृष्टि चांगली होते.

* हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.

* गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तूप खुप फायदेशीर ठरतं.

* उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.

* डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

* शंभर वेळा धुतलेले तूप (शतधौत घृत) त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे. 

* तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे. 

* शुद्ध तुपामुळे चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं. चमकदार होतो.

* डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्या कपाळावर हलकेच मालीश करावे. 

* तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते. 

* जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी. 

* कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे.

* तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे. 

कसे खावे?
* सकाळी व रात्रीच्या रोजच्या जेवणात २ छोटे चमचे भरून तूप घ्यावे. तूप पातळ असल्यास त्याचे प्रमाण थोडेसे अधिक चालू शकेल. 

* मसालेभात, पुरणपोळी अशा जड पदार्थाच्या जेवणात थोडे अधिक तूप घेतलेले चालू शकेल. त्यामुळे जड पदार्थ पचायला मदत होते.

* मुलांना अधूनमधून तूप- मेतकूट भात द्यावा. 

* काही भाज्यांना तुपाची फोडणीही देता येईल.

* तुपातील गोड पदार्थ खाण्यावर मात्र र्निबध हवा.

* आजार असलेल्या व्यक्तींनी तूप खाण्यास सुरुवात करताना आपल्या डॉक्टरांशी बोलून घेणे गरजेचे आहे. 

* तूप योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचा हृदयाला फायदा जरी होत असला तरी आपल्यासाठी ते प्रमाण काय असावे हे ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे.  

* तूपही अति खाल्ल्यास मळमळते. 

सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे वरील सर्व फायदे तूप खरोखर शुध्द असेल व योग्य प्रमाणात खाल्ले तरच मिळू शकतात. अन्यथा फायद्या ऐवजी नुकसानच अधिक होईल.साईचं दही, ते घुसळून काढलेलं लोणी आणि त्या लोण्याचं कढवून केलेलं;  विरजण-मंथन-अग्नी पचन असे तीन संस्कार झालेलं तूप हे पचायला हलकं  असते. अशी प्रक्रिया करून घरी तयार केलेले तूप अत्यंत पौष्टीक व फायदेशीर असते.शक्यतो घरीच बनविलेले तूप खावे. बाजारी तुपात भेसळ असू शकते.

या लेखातील काही माहीती वाचकांना जास्तीत -जास्त,माहीती एकत्रित वाचनास मिळावी यासाठी गुगलवरून संग्रहीत केली आहे.

इतके उपयुक्त, गुणकारी "घरगुती साजुक तूप " कसे बनवावे याची सचित्र कृती पहाण्यासाठी येथे पहा 👇 👇 👇 👇 👇
http://swadanna.blogspot.in/2016/12/clarified-butter-ghee.html?m=1

No comments :

Post a Comment